
लातूर :- ( प्रतिनिधी ) दिनांक 23/02/2022 रोजी सायंकाळच्या सुमारास लातूर शहरातील छत्रपती चौक ते बार्शी जाणारे रिंगरोड वरील एका हॉटेलमध्ये जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून सराईत आरोपी नामे
1) पंकज श्यामसुंदर पारिख, वय 26 वर्ष, राहणार भोक्रंबा तालुका रेनापुर, सध्या राहणार आदर्श कॉलनी लातूर.
2) श्रीहर्ष उर्फ हर्षवर्धन देवेंद्र मोरे, वय 18 वर्ष, राहणार मोती नगर लातूर.
3) यश उर्फ यशोधन केशव कातळे, वय 19 वर्ष, शिक्षण राहणार गरसुळी तालुका रेनापुर, सध्या राहणार अष्टविनायक मंदिराजवळ, शिवाजीनगर लातूर.
4) बालाजी सुधाकर शिंदे, वय 25 वर्ष, राहणार मुळकी तालुका अहमदपूर,सध्या राहणार रेणुका नगर लातूर.
5) सुमित उर्फ सुम्या सतीश बनसोडे, वय 26 वर्ष, राहणार गांधी नगर लातूर.
6) आदित्य बाळकृष्ण पाटील, वय 20 वर्ष, राहणार परशुराम पार्क हरंगुळ रोड, लातूर.
यांनी चाकूचा धाक दाखवून हॉटेल चालकास “तू मला जेवणाचे पैसे का मागतोस? आम्ही दादा आहोत असे म्हणून आम्हाला खर्च करण्यासाठी तूच 5,000/- रुपये दे” असे म्हणून हॉटेल चालकाच्या काउंटर मधील 4,700/- रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हॉटेलमधील वाचमन, वेटर व इतर ग्राहकांना मारहाण करून खल्लास करण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादीवरून विवेकानंद चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 126/2022 कलम 395, 397 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपासादरम्यान नमूद गुन्ह्यातील आरोपी यांचे विरुद्ध या अगोदर पोलीस ठाणे शिवाजी नगर, विवेकानंद चौक, लातूर ग्रामीण, तसेच वाकड पोलिस स्टेशन, हिंजवडी पोलिस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय या ठिकाणी सुद्धा जीवे ठार मारणे, ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर रित्या घातक शस्त्र वापरणे, घातक शस्त्रांची विक्री करणे, घातक शास्त्राचा वापर करून गंभीर दुखापत करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, बेकायदेशीर रित्या हत्यार जवळ बाळगून त्याचा वापर करून लुटमार करणे अशा गंभीर स्वरूपाचे एकूण 18 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.आरोपी पंकज श्यामसुंदर पारीख याने इतर वेगवेगळ्या साथीदारांना एकत्र करून टोळी तयार करून, टोळीतील सदस्याचे साह्याने वेळोवेळी लातूर शहर व परिसरामध्ये हिंसाचाराचा अवलंब करून वर्चस्व राहावे व त्यातून त्यांना आर्थिक लाभ होणे साठी संघटितपणे वेगवेगळे साथीदार घेऊन टोळी निर्माण केली होती. त्यामुळे त्यांच्यावर वेळोवेळी प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आलेली होती. परंतु त्यांच्यामध्ये काहीच फरक पडला नाही. गुन्हेगारी टोळीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे,यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे यांचे नेतृत्वात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव तयार करून सदरचा प्रस्ताव मंजुरीसाठी मा. पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांच्याकडे सादर करण्यात आलेला होता. त्यावर सदरच्या प्रस्तावाला पोलीस उपमहानिरीक्षक श्री.निसार तांबोळी यांनी मंजुरी दिल्याने आरोपीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र, नांदेड श्री. निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक श्री.निखील पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.जितेंद्र जगदाळे, स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे, पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे पोलीस निरीक्षक श्री.सुधाकर बावकर पोलीस अंमलदार अभिमन्यू सोनटक्के, पांडुरंग सगरे यांनी पार पाडली.
