Spread the love

उस्मानाबाद,दि.11(श्रीकांत मटकीवाले ) – सद्या सोशल मीडियाच्या युगात वाचकांची संख्या कमी झाली असुन, वाचक वर्ग वाढविण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील ग्रंथालयांनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवल्यास मोठ्या प्रमाणात वाचक वर्ग उपलब्ध होऊन वाचनालयांना सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ.गणपतराव मोरे यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयच्या वतीने दि.11 डिसेंबर रोजी ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी समारोपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवशी ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व.ग.सुर्यवंशी, ग्रंथालय निरीक्षक राठोड, नितीन तावडे, मराठवाडा साहित्य परिषदचे अध्यक्ष, लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ.गणपतराव मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.मोरे म्हणाले की, ग्रंथालय ही मानवी जीवनात विकासाची क्रांती घडविणारे सर्वात मोठे हत्यार आहे,ज्या ज्या लोकांनी सर्वात जास्त ग्रंथालयाचे वाचन केले, ते बुध्दी जीवी विद्वान मानव ठरले असल्याची बरीचंशी उदाहरणे आहेत. ग्रंथालय हे मोठं मोठे अधिकारी घडवणारी खाण असल्याने, ग्रंथालय चालकांनी, कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे न्युनगंड न बाळगता,आपण करत असलेले कार्य सर्वोत्तम आहे, असे समजून कार्य करत रहावे. उस्मानाबाद जिल्हा हा मागास जिल्हा नसून बुध्दीजीवी लोकांचा जिल्हा आहे,असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.नितीन तावडे म्हणाले की, आपला जिल्हा हा संतांची, साहित्यकांची,लेखकांची भूमी आहे.येथे साहित्याला मरण नाही.वाचक कमी झाला म्हणून ग्रंथालय क्षेत्रातील लोकांनी निराश न होता,वाचक वर्ग वाढविण्यासाठी प्रयत्न करत रहावे. या कार्यक्रमाकरिता जिल्ह्यातील शासन मान्यता प्राप्त वाचनालयांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोमटे यांनी केले,तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!