Spread the love

 लातूर(प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे मार्फत अनुदानीत रमाई आवास योजनेअंतर्गत ६०  लाभधारकांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण लातुर शहर महानगरपालिके मार्फत करण्यात आले आहे.एकूण १०१३ प्रस्ताव या योजनेत मंजूर झालेले आहेत.

   ज्या नागरिकांना घर नाही पण स्वत:ची जागा आहे किंवा ज्यांचे घर कच्चे आहे अशा नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.२०२०-२१ यावर्षी ही १०१३ घरकुले मंजूर झालेली आहेत.परंतु शासनाकडून मिळणाऱ्या निधी अभावी कामे थांबलेली होती.काही दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून या योजनेसाठी निधी उपलब्ध झाला असून लातूर महानगरपालिकेने लाभधारकांना घरकुल मंजुरीचे आदेश वितरीत केले त्यानुसार लाभधारकांनी कामे सुरू केली आहेत.

   लाभधारकांना या योजनेत एकूण ३ टप्प्यात अडीच लाख रुपयांचा निधी दिला जातो.घराचे बांधकाम सुरू केल्यानंतर १ लाख रुपयांचा पहिला टप्पा,लेंटल लेव्हलचे बांधकाम झाल्यानंतर उर्वरित बांधकाम,छत व गिलाव्यासाठी दुसऱ्या टप्प्यात १ लाख रुपये दिले जातात.पूर्ण बांधकाम व शौचालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर शेवटचा ५० हजार रुपयांच्या टप्पा लाभधारकाला मिळतो. योजनेनुसार लाभधारकाने एकूण ३२३ चौरस फूट क्षेत्रफळ बांधकाम करणे आवश्यक आहे.

शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर मागील आठवड्यात ६०  लाभधारकांनी बांधकामे सुरू केली आहेत.या सर्व लाभधारकांना प्रत्येकी १  लाख रुपयांचा पहिला टप्पा असे एकूण ६० लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.रमाई आवास योजनेअंतर्गत ज्या लाभधारकांना घरकुल मंजूर झाले आहे त्यांना लगेचच पहिल्या हप्त्याचे वितरण केले जाईल.तरी घरकुल मंजुर झालेल्या नागरिकांनी लवकरात लवकर बांधकामास  सुरुवात करावी असे आवाहन मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!