
गोवंशातील लंपी त्वचा रोग मनुष्यात होत नाही–
प्रा डॉ अनिल भिकाने
संचालक माफसू नागपूर
नागपूर (प्रतिनिधी) गेल्या जुलै महिन्यापासून देशातील अनेक राज्यात गोवंशात लंपी रोगाची साथ मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे .त्यामुळे राजस्थान गुजरात पंजाब हिमाचल प्रदेश आदी जनावरात मोठ्या प्रमाणावर मरतूक होत आहे . महाराष्ट्रातही या रोगाची साथ आतापावेतो २४ जिल्ह्यात फैलावली आहे त्यामुळे सर्व लोकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात भर म्हणून काहीजन शेळी – मेंढी आणि कोंबड्यांचे मांस खाल्याने मनुष्यात लम्पी त्वचा रोग होत असल्याच्या बातम्या समाज माध्यमांवर व्हायरल करत आहेत. या बातम्यात कुठेलेही तथ्य नसून लम्पी त्वचा रोग हा गोवंशातील विषाणूजन्य रोग असून तो शेळ्या-मेंढ्यात व कोंबड्यांत अजिबात होत नाही. त्यामुळे शेळया मेंढ्यांचे मटण अथवा चिकन खाल्ल्याने मनुष्यास रोग होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . विशेष म्हणजे लम्पी हा प्राणीजन्य रोग नसल्याने तो मनुष्यात अजिबात होत नाही. लंपी रोगाच्या गेल्या ९३ वर्षापासून च्या इतिहासात या रोगाची लागण कधी मनुष्यास झाली अशी नोंद नाही. तसेच
लंपी रोग जनावरांच्या सानिध्यात आल्याने किंवा रोगी जनावरांचे दुध प्याल्याने होत नाही.
विशेष म्हणजे लम्पीचे विषाणू हे ७०° से. ग्रे तापमानाला १-३ मिनिटात असक्रिय होतात. त्यामुळे उकळलेले दुधात व पाकीटातील पाश्चुराईज्ड दुधात जंतू जिवंत राहत नाहीत त्यामुळे दुध बिनधास्त प्यावे . मात्र शास्त्रीयदृष्ट्या कधीही दूध हे उकळूनचं प्यावे आणि मांस हे शिजवूनचं खावे असे आवाहन राज्य लंपी चर्मरोग टास्क फोर्स चे सदस्य तथा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर चे विस्तार शिक्षण संचालक प्रा.डॉ अनिल भिकाने यानी केले आहे .