पहिल्या टप्प्यात लातूरमध्ये होणार 1920 कोचची निर्मिती
लातूर-(प्रतिनिधी ) मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याला सुरुवात करण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया देखील आता अंतिम टप्प्यात आली आहे . भारत सरकारचा अंगीकृत उपक्रम असलेल्या रेल विकास निगम लिमीटेड आणि रशियाच्या सीजेएससी ट्रान्समास कॅसोर्टियम या दोन कंपन्यांच्या संयुक्त माध्यमातून 200 वंदे भारत रेल्वेची निर्मिती केली जाणार आहे . तशी निविदा प्रक्रिया पार पडली असून निविदेची अंतिम निश्चिती करणे सुरु आहे . वरील दोन कंपन्या बरोबरच मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात भारत हेवी इलेकट्रीकल म्हणजे भेल आणि टिटागड वॅगन्स कॅसोर्टियम या दोन कंपन्या देखील वंदे भारतच्या निर्मितीमध्ये सहभाग घेणार आहेत. उत्पादन सुरुवात झाल्या नंतर पुढची ३५ वर्षे उत्पादित झालेल्या रेल्वे बोगींची उत्पादना नंतरची देखभाल, दुरुस्ती याच कंपन्यांना करावी लागणार आहे . मराठवाडा रेल्वे कोच कारखाना लवकरात लवकर सुरुवात करावा अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी सरकारकडे वेळोवेळी केलेली आहे. त्यामुळे या प्रक्रियेला वेग आला आहे,अशी माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शामसुंदर मानधना यांनी कळवली आहे. — मराठवाडा रेल्वे कोच कारखाना चालवायला घेण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत भाग घेऊन सर्वात कमी बोली सांगणारी कंपनी म्हणून रेल विकास निगम लिमीटेड आणि रशियाच्या सीजेएससी ट्रान्समास कॅसोर्टियम या दोन कंपन्या प्रथमतः पुढे आल्या आहेत . या दोन कंपन्या सोबत करार करण्या संबंधीची प्रक्रिया सध्या सुरु आहे . निश्चित करण्यात आलेल्या 200 पैकी 120 वंदे भारत रेल्वे गाड्या ह्या लातूरच्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात तयार होणार आहेत तर उर्वरित 80 रेल्वेगाड्या ह्या चेन्नई येथे उत्पादित होणार आहेत. 120 रेल्वे म्हणजे 1920 कोच लातूरमध्ये उत्पादित होणार आहेत . यासाठीची 58 हजार कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे . अशी माहिती शामसुंदर मानधना यांनी दिली आहे. –मराठवाडा रेल्वे कोचसाठी भारत हेवी इलेकट्रीकल्स म्हणजेच भेल आणि टिटागड वॅगन्स या दोन कंपन्यांनीही निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता . या दोन कंपन्यांनाही रेल्वे विभागाने उत्पादन प्रक्रियेत सहभागी करून घेतले आहे . याप्रक्रियेत देशातील आणि देशा बाहेरील इतरही अनेक कंपन्यानी सहभाग घेतला होता. वंदे भारत रेल्वेच्या सर्व बोगी ह्या स्टीलमध्ये बनविण्यात येणार आहेत . तर वंदे भारत हि सेमी हाय-स्पीड ट्रेन असून ज्यामध्ये 16 सेल्फ प्रोफेल्ड कोच आहेत . विशेष म्हणजे तिला वेगळ्या इंजिनची आवश्यकता असणार नाही . या रेल्वे गाड्या वातानुकूलित असून जिवाणू विरोधी प्रणाली यामध्ये असणार आहे . 140 सेकंदात 160 किमी ताशी वेग घेण्याची क्षमता या गाड्यांमध्ये असणार आहे . केंद्र सरकारने 2021-2022 च्या अर्थसंकल्पात 2024 ते 2025 च्या अखेरीस भारतात 400 वंदे भारत रेल्वे गाड्या तयार करण्याचे महत्वकांक्षी लक्ष ठेवले आहे . परदेशातही या वंदे भारत रेल्वे गाड्या पाठविण्याचा सरकारचा मनोदय आहे. मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याशी निगडित प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी सरकारकडे वेळोवेळो केलेली आहे. याशिवाय मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याच्या उदघाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आग्रहपूर्वक निमंत्रित करण्यात यावे अशी विनंती खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे केली आहे. त्यामुळे लवकरच हा कारखाना सुरुवात होऊन यामधून रेल्वे बोगी तयार होऊन बाहेर पडतील अशी अपेक्षा आहे.