शिरुर अनंतपाळ(प्रतिनिधी) मागील दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात गरीबांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात आल्या. यातून गरिबी हटविण्यासाठी केंद्र सरकारची कटिबध्दता दिसून आल्याचे मत युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले.
लातूर लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवारगट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाई (आठवले), रासप, रयत क्रांतीसह महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ शिरुर अनंतपाळ तालुक्यात विविध ठिकाणी आयोेजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना निलंगेकर बोलत होते.
यावेळी उमेदवार खा. सुधाकर शृंगारे, युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, पंडितराव धुमाळ, अॅड. संभाजीराव पाटील, शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, रिपाइं आठवले गट जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, रासप जिल्हाध्यक्ष नागनाथ बोडके, मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने, माजी जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यंकट बेद्रे, भारत चामे, भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश पाटील कुमोद लोभे, विठ्ठल पाटील, विकास शिंदे, शिवाजी पेठे, मधुकर कांबळे, शिवाजी हजारे शेषराव ममाळे, दगडू सोळुंके आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अरविंद पाटील म्हणाले की, खा. सुधाकर श्रृंगारे यांनी गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातील कोणाचेही मन दुखावले नाही. त्यामुळे या मतदारसंघातून 75 हजारांचे मताधिक्य मिळाले पाहिजे. सर्व पक्षाचा समन्वय प्रत्येक घरापर्यंत दिसला पाहिजे. पंतप्रधान मोदी संसदेत जाताना नतमस्तक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीब कल्याणाच्या 96 योजना राबवल्या. आपला देश सर्वच बाबतीत सुरक्षित आहे. दिशा व विश्वास देणारा नेता मोदीजी आहेत. आज विकसित भारतासाठी मोदीजी प्रयत्न करीत आहेत. आ. संभाजी पाटील पालकमंत्री असताना लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याला समान निधी दिला.भाजपने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला, समाजकल्याण, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ना. बनसोडे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. बाबासाहेबांचे संसदेत तैलचित्र लावण्यासाठी काँग्रेसला तब्बल पन्नास वर्षे लागली. काँग्रेस आज अपप्रचार करत आहे. घटना बदलणार हे खोटे सांगत आहे. या पृथ्वीतलावर चंद्र सूर्य असेपर्यंत बाबासाहेबांची घटना कोणी बदलणार नाही,असेही त्यांनी सांगितले.
